Saturday, July 23, 2016

तस्मै श्रीगुरवे नमः

"माझे नाव सतिश वसंत गावडे. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांवकोंड" आपल्या बोलण्यात "अशुद्ध" शब्द येणार नाही याची काळजी घेत मी वर्गाला माझी ओळख करुन दिली.

शाळेचा पहिला दिवस. गोरेगांवच्या ना. म. जोशी विद्याभवनचा इयत्ता पाचवी ब चा वर्ग. गोरेगांव तसं शहरवजा खेडेगांव. आजूबाजूच्या पंधरा-वीस खेडेगावांचे बाजार हाट करण्याचे ठिकाण. शाळा पुर्ण जिल्ह्यात नावाजलेली. अगदी माणगांव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार चार तालुक्यांच्या ठिकाणांहून मुलं ना. म. जोशीला शिकायला यायची. आजही येतात. असा शाळेचा नावलौकिक.

आमचं गाव वडगांवकोंड गोरेगांवपासून तीन किमी अंतरावर. गावातील जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंतच. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ना. म. जोशीलाच प्रवेश घ्यावा लागे. तेव्हा गोरेगांव ते वडगांवकोंड रस्ता कच्चा होता. बस सेवेचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे गोरेगांवला जाण्यासाठी पायी चालत जाणे, सायकलने जाणे, बैलगाडीने जाणे किंवा स्वतःच्या वाहनाने जाणे हेच पर्याय होते. शेवटचा पर्याय उपलब्ध असणारे भाग्यवान पुर्ण गावात हाताच्या बोटावर मोजण्याईतके कमी होते. रस्त्यात वाटेत एक ओढा लागतो. पावसाळ्यात गावाशेजारून वाहणार्‍या काळ नदीला पूर आला की रस्ता पाण्याखाली जातो. आम्हा शाळकरी मुलांसाठी शाळेत पायी चालत जाणे हा एकमेव पर्याय होता तेव्हा.

ना. म. जोशीत तेव्हा नविन प्रवेश देताना तुकडी कशी ठरवत असत याची मला काही कल्पना नाही. मात्र पाचवीच्या तेव्हा अ पासून अगदी ग पर्यंत तुकड्या होत्या. सर्वात हुशार मुलं अ वर्गात तर सर्वात ढ, नापास झालेली मुलं ग वर्गात असा काहीसा मामला होता. मी खेडयातला असलो तरी त्यातल्या त्यात हुषार असल्याने मला ब वर्ग मिळाला असावा.

पहिल्या तासाला वर्गशिक्षिकेने दिलेल्या वेळापत्रकानूसार तो हिंदीचा तास असावा. एक उंच शिडशीडीत काळे सावळे सर वर्गावर आले होते. वय पन्नाशीचं किंवा थोडंफार कमी असावं. नाकावर जाड भिंगाचा चष्मा. करारी आणि खर्जातला आवाज. पाहताक्षणी दरारा वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव शेख सर हे नंतर वरच्या वर्गात शिकणार्‍या मुलांकडून कळलं. शेख सर हिंदी आणि पी. टी. चे तास घ्यायचे. खो खो हा बहूधा त्यांचा आवडता खेळ असावा. मुलांचा खोखोचा खेळ चालू असला की सर त्या मुलांना मार्गदर्शन करताना त्यांच्यातील एक होऊन जायचे.

सर हिंदीही खुप छान शिकवायचे. वर्गात शिकवतानाही ते खेळाच्या मैदानाईतकेच रंगून जायचे. मग ती "मेरा छाता" सारखी कविता असो किंवा "मामा की ऐनक" सारखा धडा असो, सर आवाजात चढ उतार आणून नाट्यमयता निर्माण करायचे. मुलं अगदी रंगून जायची. त्यातूनच एखाद्या मुलाचं लक्ष नसलं ते आवाज वाढवायचे. हातातील डस्टर त्या विद्यार्थ्यावर फेकल्याचा अभिनय करायचे. मात्र तो डस्टर ते हाताच्या मागे हळूच पाडायचे. मुलं खळाळून हसत. सर हिंदीचे व्याकरण शिकवायचे तेव्हा तर धमाल असायची. ते "यह गमला हैं, वह गमले हैं" मुलं त्यांच्या मागोमाग एका सुरात म्हणायची.

मला तिमाही परीक्षेत सार्‍याच विषयांत चांगले मार्क्स मिळालेले सरांना कळलं. त्यानंतर सर माझी विचारपूस करु लागले. माझ्यावर विशेष लक्ष देऊ लागले. त्यांनी एकदा मला माझ्या घरच्यांबद्दल विचारले असता आम्हा दोघांमधला वेगळाच ऋणानुबंध समोर आला. माझे बाबाही सरांचे विद्यार्थी होते. ते कळल्यानंतर सर माझ्या बाबांकडेही माझ्या अभ्यासाची चौकशी करु लागले.

पाचवीची परीक्षा झाली. निकाल लागला. मी पाचवी ब वर्गात पहिला आलो होतो. पुढचा वर्ग सहावी ब. यावेळी सर आमच्या वर्गाला कोणताच विषय शिकवायला नव्हते. शाळा सुरु होऊन दोन तीन दिवस गेले. एके दिवशी ते आमच्या वर्गाच्या बाहेर आले. सरांबद्दल इतर शिक्षकांमध्ये खुप आदर होता. वर्गावर शिकवणारे शिक्षक बाहेर गेले. त्यांचे सरांशी काही बोलणे झाले.

"गावडे, तुला शेख सरांनी बाहेर बोलावलं आहे." त्या शिक्षकांनी आत येताच मला सांगितले. मला कळेना. मी सरांचा तसा लाडका विद्यार्थी जरी झालो होतो तरी मला सरांची तितकीच भीतीही वाटायची.
"ऐक, उद्यापासून तू अ वर्गात बस. मी प्राचार्यांशी तुझी तुकडी बदलण्याबद्दल बोललोय. त्यांनी परवानगी दिली आहे."

माझीही खुप ईच्छा होती अ वर्गात बसण्याची. कारण अ वर्ग तेव्हा हुषार मुलांचा वर्ग मानला जायचा आणि मला त्या वर्गात बसायचे होते. माझी ही ईच्छा अगदी अनपेक्षितपणे पुर्ण झाली होती. शेख सरांनी माझ्याही नकळत माझ्यासाठी प्राचार्यांकडे शब्द टाकला होता. मात्र त्याक्षणी मला अचानक रडू कोसळले. ब वर्गातून अ वर्गात जाताना आपले गावातील सर्व मित्र ब वर्गातच राहणार आहेत हे मला अचानक आठवले. सारे मित्र मागे टाकून अ वर्गातील शहरी मुलांमध्ये जाण्याच्या कल्पनेचा मी आधी विचारच केला नव्हता. आणि याक्षणी मला ते सुचले. सरांनी मला शांत केले. माझ्या रडण्याचे कारण विचारले. मी ही निरागसपणे कारण सांगितले. त्यांनी मला ब वर्गातील माझ्या सर्वात जवळच्या दोन मित्रांची नावे विचारली. मी ती सांगितली. सरांनी त्या दोघांनाही बाहेर बोलावले. "उद्यापासून तुम्ही दोघे सतिशसोबत अ वर्गात बसा".

सर सहावी अ ला हिंदी शिकवायला होते. मी पुन्हा एकदा सरांच्या नजरेसमोर आलो.

आमच्या घरी तेव्हा गाई म्हशी होत्या. मी सकाळी शाळेत जायच्या आधी तीन चार तास गुरं चरायला नेत असे. गुरांच्या पाठी अनवाणी माळरानांवर, काट्याकुट्यांमधून वारं प्यायल्यागत हुंदडत असे. एके दिवशी कसा कोण जाणे, गुरांकडे गेलो असताना बाभळीचा काटा पायात अगदी खोलवर रुतला. पायावर भांबूर्डीचा पाला चोळून रक्त थांबवले. लंगडत लंगडत घरी आलो. घरी आल्यावर आईने काटा काढला खरा पण खोलवर गेलेले काट्याचे टोक आतच राहीले. एक एक दिवस जाऊ लागला आणि माझा पाय अधिक अधिक सुजायला लागला. पायात पू झाला. चालता येईनासे झाले. दोन तीन दिवस शाळा बुडाली. शेवटी डॉक्टरकडे जाऊन इलाज करुन घेतला.

शाळेत पुन्हा जाऊ लागताच सरांनी माझी शाळेत का येत नव्हतो म्हणून विचारपूस केली. मी जे घडले होते ते सांगितले. सरांनी बाबांना शाळेत बोलावून घेतले. माझ्या पायात चप्पल का नसते म्हणून बाबांची खरडपट्टी काढली. त्याच दिवशी संध्याकाळी बाबांनी माझ्यासाठी स्लिपर्स घेतले.

केव्हातरी बोलताना सरांनी मला अशफाकबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल सांगितले. तो केमिकल इंजिनीयर झाला होता आणि आय आय टी मद्रास मधून तेव्हा एम टेक करत होता. "इंजिनीयर" या शब्दाशी सरांनी माझी ओळख करुन दिली. सर अशफाकबद्दल भरभरुन बोलायचे माझ्याशी. त्या प्रेमळ बापाला आपल्या हुषार लेकराचे किती कौतुक करु आणि किती नको असे होऊन जायचे. मात्र तेव्हा सर माझ्याही नकळत मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवत होते हे मला खुप उशिरा कळले.

सर पाचवी ते सातवी या वर्गांना शिकवायचे. मी आठवीला गेल्यावर त्यांच्याशी माझे प्रत्यक्ष बोलणे कमी झाले. आठवीचा रिझल्ट लागला. सर रिझल्टच्या दिवशी माझ्या वर्गाच्या बाहेर उभे होते. पुन्हा एकदा सहावी ब ला असताना जसे घडले होते तसेच घडले. मुलांचे रिझल्ट देता देता वर्गशिक्षिका सरांना भेटायला बाहेर गेल्या.

"गावडे, तुला शेख सर बाहेर बोलावत आहेत", मॅडमनी आत येताच मला सांगितले.

"ऐक, तुला बाटू माहिती आहे का?", मी बाहेर जाताच सरांनी मला विचारले.
"बाटू बद्दल मी फक्त ऐकलंय. जास्त काही माहिती नाही मला"
"बाटू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी. आपल्या लोणेरेला आहे. तिथे इंजिनीयरींगचे शिक्षण मिळते." सरांनी मला समजेल अशा शब्दांत सांगितले.
"बाटूला दहा दिवसांचे निवासी शिबीर आहे आठवी ते दहावीच्या मुलांसाठी. दहा दिवस तिथेच राहायचे. जेवण वगैरे तिथेच मिळेल. तिथे कॉम्पुटर शिकवणार आहेत. कारखान्यांना भेट द्यायला नेणार आहेत. मी तुझे नाव दिले आहे आपल्या शाळेकडून जाणार्‍या मुलांमध्ये. खुप शिकायला मिलेल तुला. तुझ्या बाबाला सांगतो मी तुला या शिबिराला पाठवायला."

सरांनी जर माझे नाव दिले नसते तर माझ्यासारख्या खेड्यातील मुलाचा कुणी कधी विचारही केला नसता तसल्या शिबिरासाठी.

पुढे चार वर्षांनी बारावीनंतर मी याच बाटूला इंजिनीयरींगला प्रवेश घेतला. नव्हे, सरांनी अप्रत्यक्षपणे माझे बोट धरुन मला तिथवर नेले होते.

मी इंजिनीयरींगला तिसर्‍या वर्षाला असताना एक गंमतीदार प्रसंग घडला. एके दिवशी संध्याकाळी बाबांनी मला "तुला शेख सरांनी भेटायला बोलावले आहे" म्हणून सांगितले. सर माझ्यासाठी निरोप द्यायला बाबांच्या ऑफिसला गेले होते. मी सरांना भेटलो.

"अरे माझी मुलगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी कॉम्पुटर करत आहे. तिला एक कॉम्पुटर प्रोग्रामिंगची असाईनमेंट मिळाली आहे. तिला काही ते जमत नाही. मी माझ्या ओळखीतल्या खुप जणांना विचारले. सगळेच आम्हाला नाही जमणार म्हणत आहेत. आपल्या गोरेगांवचा एक मुलगा बाटूला तुला एक विषय शिकवायला आहे. त्याने कदाचित तू हे करु शकशील असे मला सांगितले", सरांनी मला बोलावण्याचे कारण सांगितले.

सरांनी असाईनमेंटचा पेपर दाखवला. कॉम्पुटर ग्राफिक्स संदर्भातील ती प्रश्नावली होती. संगणकाला सांख्यिकी विदा पुरवायचा आणि त्या विदापासून विविध प्रकारचे आलेख स्क्रीनवर दाखवायचे अशा आशयाचे प्रश्न होते सारे. मी होतो ईलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनीयरींगचा विद्यार्थी. इंजिनीयरींच्या पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा एक विषय असतो. मात्र त्यातून मिळणारे कॉम्पुटर प्रोग्रामिंगचे ज्ञान खुपच जुजबी असते. दुसर्‍या वर्षापासून आयटी आणि कॉम्प्युटर वगळता बाकीच्या शाखांचे विद्यार्थी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा नाद सोडून देतात. मी मात्र या विषयाचा मनापासून अभ्यास केला. पुढच्या दोन वर्षात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग बर्‍यापैकी येणारा मुलगा अशी माझी कॉलेजमध्ये ख्याती झाली होती. आणि यातूनच शेख सरांपर्यंत माझे नाव गेले होते.

आता यातील ग्यानबाची मेख अशी होती की मला आकडेमोड किंवा तार्किक बाबींचे प्रोग्रामींग जमायचे सी प्रोग्रामींग ही भाषा वापरुन. सरांच्या मुलीची असाईनमेंट ग्राफिक्स प्रोग्रामींगमधील होती. मला त्यातले ओ की ठो कळत नव्हते. मात्र मी सरांना तसे सांगितले नाही. ज्या गुरुंनी आजवर माझे बोट पकडून मला मार्ग दाखवला त्या गुरुंनी आज पहिल्यांदा माझ्याकडे काही मागितले होते. माझी गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली होती.

मी सरांकडून आठवड्याचा अवधी मागून घेतला. पुढच्या तीन चार दिवसांत कॉलेजच्या वाचनालयातील "ग्राफिक्स प्रोग्रामिंग" संबंधीच्या पुस्तकांचा फडशा पाडला. प्रकरण मी समजलो होतो तितके अवघड नव्हते. मला जमण्यातला प्रकार होता. आणि जमलेही. मी तयार केलेल्या प्रोग्राम्सच्या प्रिंटस काढून घेऊन ते प्रोग्राम्स सरांच्या मुलीला समजावून सांगितले. तिला स्वतः समजून घेऊन लिहून काढण्यास, स्वतः पुन्हा बनवण्यास सांगितले.

त्या असाईनमेंटला तिला खुप चांगला शेरा मिळाला. सरांनी मला त्यांच्या घरी बोलावले. कोकणातील खेडयात वाढलेल्या मुलांमध्ये मुस्लीम घरांबद्दल ज्या काही चित्र विचित्र कल्पना असतात तशा माझ्याही होत्या. मुख्य वस्तीपासून काहीसे वेगळे असलेले मुस्लीम मोहल्ले त्यात अधिक भर टाकतात. सरांचे घर तसे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर होते. तरीही मी जरा बिचकत बिचकत सरांच्या घरी गेलो.

सरांनी माझे त्या असाईनमेंटबद्दल कौतुक केले. माझ्या पाठीवरुन हात फिरवला. त्यांच्या नजरेत कृतकृत्य झाल्याचे भाव होते. त्यांनी रुजवलेलं ज्ञानाचं रोपटं आज त्यांच्या पुढ्यात तरारुन उभं होतं. मी मनातील सारे किंतू झटकून देऊन सरांच्या घरुन चहा नाश्ता करुन सरांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो.

मी आज जो कोणी आहे तो माझ्या इंजिनीयरींगच्या पदवीमुळे आहे. मात्र ही पदवी माझी एकट्याची कमाई नव्हे. माझ्या आई वडीलांच्या जोडीने अनेक ज्ञात अज्ञात हातांनी मला मदत केली. शेख सरांनी माझ्या मनात इंजिनीयरींगच्या शिक्षणाचं बीज रुजवलं, त्यांच्या मुलाबद्दल वेळोवेळी सांगून माझ्या मनात रुजवलेल्या त्या बीजाला पाणी घातलं. आठवी संपतानाच एका शिबिराच्या निमित्ताने मला माझ्या भविष्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दारात नेऊन सोडलं.

माझ्यासारखा अनवाणी पायांनी गुरं राखणारा, भातशेतीमध्ये कंबरडं मोडेपर्यंत लावणी, कापणी करणारा मुलगा जेव्हा शिक्षण संपल्यानंतर फक्त अडीच वर्ष भारतात काम केल्यानंतर पुढचे दिड वर्ष जेव्हा अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून काम करतो तेव्हा त्यामागे शेख सरांसारख्या आपल्या शिष्याच्या हिताचा कायम विचार करणार्‍या प्रेमळ गुरुंची पुण्याई उभी असते.

माझ्या या गुरुने मी जवळपास अजाण वयाचा असताना मला माझं ध्येय काय आहे हे सांगितलं नसतं, वेळोवेळी मला तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवला नसता तर न जाणो मी आज काय असतो, कुठे असतो.

जगदगुरु महर्षी व्यासांचे शब्द उसने घेऊन मला माझ्या या गुरुला वंदन करताना म्हणावेसे वाटते,

 अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया |
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||
त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता |
संसारप्रतिबोधार्थं तस्मै श्रीगुरवे नमः ||

Thursday, June 23, 2016

तो हा नाथसंकेतीचा दंशु

पिण्डे पिंडाचा ग्रासु | तो हा नाथसंकेतीचा दंशु | परि दाऊनि गेला उद्देशु | महाविष्णु ||ज्ञा. ६-२९१||

"अलख निरंजन"
आपेगांवच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांच्या वाडयासमोर उभे राहून त्या कानफाटया जोग्याने आवाज दिला. दाढीजटा वाढवलेल्या, कमरेपासून छातीपर्यंत गुंडाळलेली मेखला, जानव्यासारखी शोभणारी शैली, हरणाच्या शिंगाची शॄंगी, पुंगी, कर्णकुंडले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात त्रिशूल, काखेत झोळी, पायात खडावा अशा काहीशा आदरयुक्त भीतीदायक वेशात तो जोगी घरातून भिक्षा येण्याची वाट पाहत होता. चेहर्‍यावरील सुरकुत्या जरी वय वाढल्याचे सांगत होत्या तरी चेहर्‍यावरील तेज लोपले नव्हते.
गोविंदपंतांनी बाहेरचा आवाज ओळखला. डोळे लकाकले, चेहर्‍यावर स्मित फुलले. त्यांनी माजघराकराडे आवाज दिला.
"अहो ऐकलंत का? लवकर बाहेर या. नाथबाबा आलेत."
गोविंदपंत लगबगीने वाडयाच्या दारावर आले. गहीवरुन जोग्याच्या चरणी लोटांगण घातले. पाठोपाठ गोविंदपंतांच्या पत्नी निराबाई आणि मुलगा विठ्ठल बाहेर आले आणि जोग्याच्या चरणी लागले.
"अलख निरंजन", जोग्याने पुन्हा एकदा खणखणीत आवाजात नमनाचा उच्चार केला.
"आदेश", गोविंदपंत, निराबाई आणि विठ्ठलाने नमनाला उत्तर दिले.
"उठा गोविंदपंत. आपेगांवाच्या कुलकर्ण्यांना एका जोगडयाच्या पायी असं झोकून देणं शोभत नाही." जोग्याने हसतच गोविंदपंताच्या दंडांना पकडून उठवले.
"उठ माऊली, विठ्ठला, ऊठ बाळा"
"नाथबाबा, असे नका बोलू. आपेगांवच काय, आपेगांवसारख्या दहा गावांचं कुलकर्णीपण तुमच्या पायी वाहीन मी." गोविंदपंतांचा स्वर व्याकुळ झाला होता.
"या गोरखनाथांच्या शिष्याला, या गहिनीनाथाला काय करायचं आहे तुमचं कुलकर्णीपण. मुक्त संचार करणारा जोगी मी. तुमच्यासारखा संसारी असा मायेच्या पाशात अडकवायला पाहतो आणि आम्हीही मग आमची पावले आपेगांवाकडे वळवतो. काय विठ्ठला, बरोबर ना रे?" त्या जोग्याने, गहिनीनाथांनी विठ्ठलाच्या पाठीवर मायेनं हात फिरवला. विठ्ठलाला अगदी बालपण सरल्यानंतर आईच पुन्हा एकदा पाठीवरून हात फिरवत आहे असं वाटलं.
गोविंदपंतांनी गहिनीनाथांचा हात धरुन वाडयात आणले. बसावयास घोंगडी अंथरली.
"काय म्हणता गोविंदपंत? कसे चालू आहे सारे?"
"काय सांगू नाथबाबा. वय झालं आता माझं. शरीर साथ देत नाही. पैलतीर साद घालत आहे. कुलकर्णीपण निभावत नाही. देवानं हे एक लेकरु पदरात घातलं. बुद्धीमान निघालं. अगदी पंचक्रोशीतील ब्रम्हवृदांना हेवा वाटावा असं हे ज्ञानी लेकरु आहे. पण चित्त संसारात नाही. विवाहाचं वय केव्हाच उलटून गेलं आहे मात्र विवाहाचं मनावर घेत नाही. सदा न कदा तिर्थयात्रेला जाण्याची भाषा. घरी असला तर कुलकर्णीपणाचं काही शिकून घे म्हणावं तर ते ही नाही. सतत त्या पोथ्यांमध्ये डोकं खुपसून बसतो. आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण त्याच्या जोडीनं प्रपंच पाहायला नको का? नाथबाबा, तुम्ही तरी त्याला समजवा."
गोविंदपंत क्षणभर थांबले. पुढे बोलते झाले, "नाथबाबा, अजून एक मागणे आहे तुमच्या पायी"
"गोविंदपंत, मी कानफाटा जोगी तुम्हाला काय देणार?"
"नाथबाबा, विठ्ठलाला तुमच्या चरणी ठाव दया"
"गोविंदपंत, तुमच्या पिताश्रींना, त्र्यंबकपंतांना गोरखबाबांचा अनुग्रह होता. देवगिरीच्या यादवांच्या सेवेत असूनही त्र्यंबकपंतांना अवधूत पंथाचा ओढा होता. गोरखबाबांनी त्यांची तळमळ ओळखली आणि त्यांना अनुग्रह दिला. तीच गत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. तुम्ही माझ्याकडून अनुग्रह घेतलात. तुमच्या धाकट्या बंधूराजांचं, हरिपंतांचंही तेच. यादवांच्या चाकरीत असताना लढाईत काळाने त्यांच्यावर घाला घातला नसता तर त्यांनीही अवधूतमार्ग अनुसरलाच असता. विठ्ठलाचे तसे नाही. हा मुक्त पक्षी आहे गोविंदपंत. त्याचा अवधूत मार्गाकडे ओढा नाही. त्याची ईच्छा नसताना मला त्याच्या अंगावर जोग्याची वस्त्रे चढवायची नाहीत."
निराबाईंनी आणलेली भिक्षा गहिनीनाथांनी आपल्या झोळीत घेतली. गोविंदपंतांचे हात हाती घेतले. मायेच्या नजरेने एकवार गोविंदपंतांकडे पाहीले.
"पंत, आदिनाथावर श्रद्धा ठेवा. सारे ठीक होईल. येतो मी. अलख निरंजन."
ज्या विठ्ठलाला गहिनीनाथांनी अनुग्रह देण्यास नकार दिला, त्याच विठ्ठलाची दोन मुलं पुढे अवधूत मार्गाची पताका जगी फडकवणार होती. आणि ते सुद्धा गहिनीनाथांकडूनच अनुग्रह घेऊन.
******************************************************

सकाळची कोवळी उन्हे घेत ती मंडळी ब्रम्हगिरीच्या भोवती असलेल्या पायवाटेनं चालली होती. माता, पिता आणि चार लेकरं असा तो लवाजमा अगदी रमत गमत चालला होता. सर्वात पुढे विठ्ठलपंत, त्यांच्या खांद्यावर चिमुरडी मुक्ता, त्या पाठोपाठ सोपान आणि रुक्मिणीबाई, त्या मागे ज्ञानदेव आणि सर्वात शेवटी निवृत्ती. खुप आनंदात होती सारी मंडळी. मुलं तर भलतीच खुश होती. बाबांनी त्यांना गौतम मुनींची गोष्ट सांगितल्यापासून मुलांना कधी एकदा ब्रम्हगिरी पाहू असे झाले होते. आणि आज तो योग आला होता.
"बाबा, मला गौतम मुनींची गोष्ट ऐकायची आहे" छोटया मुक्तेनं म्हटलं.
"ए मुक्ते, किती वेळा बाबांना तीच तीच गोष्ट सांगायला लावतेसस, छोटया सोपानाने मुक्तेला हटकले.
"मला पुन्हा ऐकायची आहे ना रे सोपानदादा"
"मुक्ते, या वेळी मी सांगू का ती गोष्ट तुला?", ज्ञानदेवाने विचारले.

ज्ञानदेव चालता चालता गौतम मुनींची गोष्ट सांगू लागला.

"खुप खुप वर्षांपूर्वी या ब्रम्हगिरी पर्वतावर गौतम नावाचे एक ऋषी आपली पत्नी अहिल्या हिच्यासह राहत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन वरुण देवतेने त्यांना एक अक्षय पात्र दिले होते. या पात्रातून त्यांना अखंड धान्य मिळत असे. हे सहन न होऊन इतर ऋषींनी एक दिवस एक मायावी गाय गौतम मुनींच्या आश्रमात पाठवली. तिला हाकलण्यासाठी म्हणून गौतम मुनींनी दर्भाच्या काही काडया गायीच्या दिशेने फेकल्या. ती मायावी गाय गतप्राण झाली. गौतम मुनींच्या माथी गोहत्येचे पातक आले. या पातकातून मुक्त होण्यासाठी गंगास्नान आवश्यक होते. गंगेला आपल्या आश्रमात आणावी म्हणून गौतम मुनींनी शिवाची तपश्चर्या सुरु केली."

ज्ञानदेवाची कथा अगदी रंगात आली होती. सोपान, मुक्ता अगदी रंगून गेले होते कथेत. आपल्या लेकराचे कथा रंगवण्याचं कसब विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई कौतुकाने पाहत पुढे चालत होते. थोरला निवृत्ती मात्र जरा मागेच रेंगाळत चालत होता. बाकीचे सारे आणि निवृत्ती यांच्यामध्ये जरासे अंतर पडले होते. इतक्यात मागे झाडीत कसलासा मोठा आवाज झाला आणि पाठोपाठ वाघाची डरकाळी ऐकू आली. विठ्ठलपंत आपल्या सार्‍या कुटुंबाला घेऊन जीवाच्या भयाने पळत जाऊन दुरवर एका शिळेच्या आडोशाला जाऊन लपले. बराच वेळ आपल्यासोबत निवृत्ती नाही हे त्यांच्या ध्यानीच आले नाही. मात्र जेव्हा निवृत्ती सोबत नाही हे त्यांना कळले सार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले. सारे निवृत्तीला साद घालू लागले.
"निवृत्ती.."
"दादा रे, कुठे आहेस?"
निवृत्तीला घातलेली साद ब्रम्हगिरीच्या कडयांवरुन घुमू लागली. मात्र निवृत्ती काही ओ देईना. सारे कासाविस झाले. सोपान आणि मुक्ता धाय मोकलून रडू लागले. ज्ञानदेवाच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. तशातही तो निवृत्तीला साद घालत होता.
"दादा रे, कुठे आहेस रे?" सादेच्या प्रतिध्वनीनंतर निरव शांतता.

सारे रान पालथे घातले. निवृत्ती कुठे दिसेना. येणार्‍या जाणार्‍या वाटसरुंना विचारले. कुणीच निवृत्तीला पाहीले नव्हते. मध्यान्ह झाली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. धाकट्या लेकरांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसले. सोबत आणलेल्या शिदोरीचे चार घास छोटया मुक्तेला भरवले. इतरांच्या गळी काही घास उतरेना. दिवस कलताच पुन्हा निवृत्तीचा शोध सुरु केला. मात्र कुठेच निवृत्ती सापडेना. संध्याकाळचा प्रहर असाच गेला. विठ्ठलपंतांना काय करावे सुचत नव्हते. सूर्य मावळतीला गेला होता. अंधार पडून लागला. नाईलाजाने जड पावलांनी ते कुटुंब त्र्यंब्यकेश्वराच्या दिशेने उतरु लागले.

"आई, बाबा, मोठा दादा कधी येईल?" मुक्तेच्या या प्रश्नाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईकडे उत्तर नव्हते.

******************************************************

वाघाची डरकाळी ऐकू येईपर्यंत निवृत्ती भानावर नव्हता. पाय जरी पायवाटेने चालत होते डोक्यात भगवद्गीतेमधील श्लोकांची आवर्तने चालू होती. आपले आई बाबा आणि धाकटी भावंडं आपल्यापासून बरीच पुढे निघून गेली आहेत याचे भान त्याला नव्हते. इतक्यात गगन भेदून टाकेल अशी वाघाची डरकाळी झाली आणि निवृत्ती भानावर आला. त्याला क्षणभर काय करावे हे सुचेना. समोरच मुख्य पायवाटेहून दूर जाणारी एक छोटीशी पायवाट त्याला दिसली. काहीही विचार न करता तो त्या वाटेने पळत राहीला. किती वेळ पळत होता त्याचे त्यालाच कळले नाही. शेवटी धाप लागल्यामुळे थबकला तर समोर एक आश्रम दिसला. आश्रमासमोर काही जोगी ग्रंथपठण करताना दिसले. हे नाथपंथी म्हणजेच अवधूत मार्गी जोगी आहेत हे त्याने ओळखले. बाबांनी आपल्याला गोरक्षनाथांबद्दल आणि गहिनीनाथांबद्दल सांगितलेले सारे आठवले. निवृत्ती असा विचार करतो इतक्यात एका जोग्याने त्याला पाहीले. तो जोगी निवृत्तीच्या जवळ आला. निवृत्तीस हाती धरुन त्यास आश्रमात आणले. त्याला पाणी प्यायला दिले.
"काय नाव बाळा तुझे"
"निवृत्ती"
"एव्हढा पळत का आलास तू? हा रस्ता तुला कोणी दाखवला?"
निवृत्तीने झालेला वृतांत त्या जोग्यास सांगितला.
"चल मी तुला आमच्या गुरुदेवांकडे नेतो" तो जोगी निवृत्तीला आश्रमाच्या अंतर्भागात घेऊन गेला.

समोर एक मंद दिप तेवत होता. एक नाथजोगी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. बराच वृद्ध दिसत होता तो नाथजोगी. केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्यांनी भरुन गेला होता. काया थरथरत होती. या दोघांची चाहूल लागताच त्या वृद्ध नाथजोग्याने डोळे उघडले. समोर आश्रमातील एका शिष्यासोबत एक बारा तेरा वर्षांचा बालक उभा होता. वयाच्या मानाने चेहरा शांत आणि धीट होता.
आश्रमातील शिष्याने आणि निवृत्तीने नमस्कार केला.

"नाव काय बाळ तुझं?", नाथजोग्याने विचारले.
"मी निवृत्ती"
"इकडे कसा आला?"
निवृत्तीने आपण ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालत असताना अचानक वाघ आला आणि आपण पळत इथवर पोहचलो हे सांगितले.
"वडीलांचं नाव काय तुझ्या?"
"विठ्ठलपंत. बाबा मुळचे पैठणजवळील आपेगावचे. आजोबा गोविंदपंत तिथले कुलकर्णी होते. आम्ही सध्या आमच्या आजोळी आळंदीला राहतो"
"तू विठ्ठलाचा मुलगा? गोविंदपंतांचा नातू?"
"होय. आपण ओळखता का माझ्या बाबांना आणि आजोबांना?"
"होय बाळा. आम्हा संन्याशांना संसाराचे पाश कधी अडवत नाहीत. मात्र तरीही जीव कुठेतरी गुंतू पाहतो. असाच मायेचा एक धागा तुझ्या आजी आजोबांशी आणि वडीलांशी जोडला गेला आहे."
"म्हणजे तुम्ही गहिनीबाबा आहात का?"
"होय बाळा"
बालसुलभ आश्चर्याने निवृत्तीचे डोळे लकाकले. आपल्या आजोबांचे गुरु आपल्या समोर आहेत या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसेना.
"ये इकडे. बस माझ्या बाजूला."

निवृत्तीने गहिनीनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवले. गहिनीनाथांच्या मनी विचार चमकला. अवधूत मार्गाला जनाभिमुख करण्याचा विचार गेली काही वर्ष त्यांच्या मनात रुंजी घालत होता. मात्र ते कसे करावे हे त्यांना कळत नव्हते. का कोण जाणे आज ती वेळ आली आहे असे त्यांना वाटले. त्यांच्याच शिष्याच्या या तल्लख बुद्धीच्या नातवाच्या रुपाने आज ती संधी आली आहे ही जाणिव त्यांना झाली.
गहिनीनाथांनी निवृत्तीच्या मस्तकावर हात ठेवला.त्यांनी आदिनाथांचे, मच्छिंद्रनाथांचे आणि गोरखनाथांचे स्मरण केले.
कापर्‍या आवाजात त्यांच्या तोंडून शब्द निघाले, "अलख निरंजन"
क्षणभर निवृत्तीचे शरीर थरारले. त्याच्या तोंडून शब्द उमटले, "आदेश".
"उठा निवृत्तीनाथ. आजपासून मी नाथपंथाची ध्वजा तुमच्या हाती देत आहे. आजवर कडयाकपार्‍यांमधील आश्रमांमध्ये मोठा झालेला, कानफाट्या जोग्यांनी लोकांपासून अलिप्त ठेवलेला हा अवधूत मार्ग तुम्ही लोकांपर्यंत न्या. नाथ संप्रदायाला लोकाभिमुख करा. मच्छिंद्रबाबा, गोरखबाबा आणि मी तिघांनी आदिनाथ शिवाला वंदनीय मानले. तुम्ही भगवान श्रीकृष्णाला मस्तकी धरा. हरि गुण गा. आम्ही ज्ञानमार्ग अनुसरला. तुम्ही भक्तीमार्गाने जा. या जगाला समतेचा संदेश द्या. मानवतेचा संदेश द्या."

निवृत्तीनाथांना आश्रमात घेऊन आलेला गहिनीनाथांचा तरुण शिष्य हे सारे आश्चर्याने पाहत होता. आज अघटीत घडले होते. गुरुंच्या चेहर्‍यावर आज आगळेच तेज होते. आपल्या गुरुबंधूंच्या या एव्हढयाशा नातवाने जणू गुरुंवर मोहिनी घातली होती. भल्याभल्यांना अनुग्रह न देणार्‍या आपल्या गुरुंनी आज या एव्हढयाशा मुलास पहील्याच भेटीत आपला शिष्य केले होते. चमत्कार झाला होता आज.

सांज ढळत होती. सूर्य मावळतीस चालला होता. गहिनीनाथांनी आपल्या दोन शिष्यांस निवृत्तीस त्याच्या आई वडीलांजवळ त्र्यंबकेश्वरी शिवमंदिरापाशी सोडण्यास सांगितले. निवृत्तीचे गुरु चरणांपासून मन निघेना. मात्र आपले आई वडील आपल्या चिंतेने कासावीस झाले असतील, ज्ञाना, सोपान आणि मुक्ता आपली काळजी करत असतील या विचारांनी तो परतण्यास तयार झाला. मात्र त्याने गहिनीनाथांकडून उद्या पुन्हा आपल्या आई वडील आणि भावंडांसह आश्रमात येण्याची आज्ञा घेतली.

******************************************************

त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी येताच दुरुनच निवृत्तीने आपले आई बाबा जिथे उतरले होते तिथे मिणमिण तेवणारा दिप पाहीला. निवृत्तीने दुरुनच आवाज दिला, "आई बाबा, मी आलोय"
मंदिरासमोरील निरव शांततेचा भंग झाला. त्या दिव्याच्या उजेडात निवृत्तीस हालचाल जाणवली. आपल्या आई बाबांना त्याने पाहीले. धावत जाऊन त्याने आईला मिठी मारली. झोपी गेलेले सोपान, मुक्ता जागे झाले. विठ्ठलपंतांनी गहीवरुन निवृत्तीच्या पाठीवरुन हात फिरवला. ज्ञानदेवाने हलकेच निवृत्तीचा हात हाती घेऊन दाबला.
"कुठे गेला होता रे बाळा आम्हाला सोडून", रुक्मिणीबाईंच्या डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या.
"दादा रे..." म्हणत सोपान आणि मुक्ता निवृत्तीकडे झेपावले.

विठ्ठलपंतांनी निवृत्तीस सोडावयास आलेल्या नाथजोग्यांची विचारपूस केली. त्या नाथजोग्यांनी विठ्ठलपंतांस निवृत्ती आश्रमात आल्यापासूनचा सारा वृत्तांत सांगितला. विठ्ठलपंत सद्गदित झाले. त्यांना काही वर्षांपूर्वी आपेगांवी घडलेला प्रसंग आठवला. आपल्या माता पित्यांची आपण गहिनीनाथांकडून अनुग्रह घ्यावा अशी ईच्छा असताना आपणास अवधूत मार्गाची ओढ नाही हे ओळखून गहिनीबाबांनी आपणास दिक्षा देण्यास नकार दिला होता हे सारे त्यांना आठवले. मात्र आज गहिनीबाबांनी आपल्या एव्हढ्याशा लेकराच्या मस्तकी आपला कृपाहस्त ठेवला. त्या महान जोग्याने आपल्या लेकरास आपल्या अनुग्रहाच्या योग्यतेचा मानले. विठ्ठलपंतांचे ह्रदय भरुन आले.

"निवृत्ती", विठ्ठलपंतांनी कातर आवाजात आपल्या जवळ बोलावले.
"काय बाबा?"
विठ्ठलपंतांनी निवृत्तीस मिठी मारली आणि म्हणाले, "लेकरा, तू आज धन्य झालास."

भावनावेग ओसरला. निवृत्तीस सोडावयास आलेले नाथजोगी ब्रम्हगिरीस निघून गेले. आपल्या आई वडीलांच्या डोळ्यातील समाधान पाहून निवृत्तीला खुप बरे वाटले. त्याला पुन्हा एकदा दुपारचा गहिनीनाथांनी त्याच्या मस्तकी हात ठेवल्याचा प्रसंग आठवू लागला. निवृत्तीच्या ओठी नकळत शब्द येऊन तो गाऊ लागला,

आदिनाथ उमा बीज प्रकटिलें | मच्छिंद्रा लाधले सहजस्थिती ||
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली | पूर्ण कृपा केली गयनिनाथा ||
वैराग्ये तापला सप्रेमें निवाला | ठेवा जो लाधला शांतिसुख ||
निर्द्वंद्व नि:संग विचरता मही | सुखानंद ह्रदयी स्थिर झाला ||
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख | देउनि सम्यक अनन्यता ||
निवृत्ती गयनी कृपा केली असे पूर्ण | कूळ हे पावन कृष्णनामे ||

Friday, October 2, 2015

आठवण...

आज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय
अगदी कोकणातल्या पावसासारखा
तसा मी इथे आहेच कुठे
मी आता कोकणातच पोहचलो आहे,
त्या हिरव्यागार डोंगर टेकडयांवर,
दुथडी भरुन वाहणार्‍या ओढयांकाठी
सर सर तीरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही
अन तुमच्या पाठोपाठ मी
किती छान होतं ना आपलं आयुष्य
फक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात
फक्त तुम्ही आणि मी
गाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं
आज तुमच्या आठवणींनी मन व्याकुळ झालंय
डोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी
आजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे
नाही तर मला थेट पावसातच जाऊन उभं राहावं लागलं असतं
कुठे असाल तुम्ही सारे आता,
खरं तर तुम्ही नसालच आता,
गाई म्हशींना कुठे वीसेक वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असतं...

Saturday, August 31, 2013

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो.
"काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो.
"महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे."
संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते.
"उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो.
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.

ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.

शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें || सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला ||

अजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले.

त्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, "हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं." हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते.

मॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती.

विज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"

Friday, October 28, 2011

हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस !!!

मेघना आज एक वर्षाची झाली. मेघना मी एक वर्षापूर्वी घेतलेली कार. ह्युंदाई आय टेन मॅग्ना १.२ या तिच्या पुर्ण नावामधल्या फक्त मॅग्नाचं मराठीकरण करुन आम्ही तिचं नाव मेघना ठेवलं.

गेल्या वर्षी साधारण सप्टेंबर मध्ये आयुष्य भयानक कंटाळवाणं झालं होतं. जे व्हायला हवं असं वाटत होतं ते होईल असं अजिबात वाटत नव्हतं आणि जे व्हायला नको असं वाटत होतं ते मात्र पिच्छा सोडायला तयार नव्हतं. यातलं एक म्हणजे माझं ऑफीसमधलं काम. मी वेब डेव्हलपर आहे या वाक्याचा भुतकाळ झाला होता. आता मी जगभरात तीन हजार युजर्स असलेल्या आणि रोज काही ना काही फाटणार्‍या वेबसाईटचा टेक्निकल लीड होतो, सोळा जणांच्या टीमचा टीम कॉर्डीनेटर होतो. पण हे दुरुन डोंगर साजरे त्यातला प्रकार होता. टेक्निकल लीड या नात्याने माझं काम काय वेबसाईटमध्ये काही फाटलं तर जोपर्यंत डेव्हलपर्स पॅच मारत नाहीत तोपर्यंत युजर्सना गंडवणं. डेव्हलपर्स टीम बिझी असल्यामुळे नविन युजर सेटप करणे, त्यांचे पासवर्ड रीसेट करणं ही असली बकवास कामे करावी लागायची. सगळ्यात अवघड काम काय तर वेबसाईटवर वापरलेला प्रोजेक्ट प्लानचा अ‍ॅक्टीवेक्स कन्ट्रोल लोड ब्राउजरमध्ये कसा लोड करायचा हे युजरला समजावणं.

टीम कॉर्डीनेटरचं काम म्हणजे तर आनंदी आनंदच होता. आमची बेचाळीस जणांची टीम. महापे, पुणे, चेन्नई, ह्युस्टन आणि सॅन रॅमॉन अशा पाच ठीकाणी विखुरलेली. प्रोजेक्ट मॅनेजर महापे, नवी मुंबईला. बाकीच्या टीम त्या त्या ठिकाणचे टीम कॉर्डीनेटर सांभाळायचे. आणि इतकी खत्रुड कामे करावी लागायची की विचारु नका. टीम मध्ये नविन डेव्हलपर आला त्याच्या साठी मशिन शोधा. ते मशीन वरच्या किंवा खालच्या फ्लोअरवर असेल तर ती मशिन आपल्या फ्लोअरवर आणण्यासाठी रीक्वेस्ट टाका, तिचा फॉलोअप करा. नाईट शिफ्टच्या डेव्हलपर्सना रात्री नाश्ता नाही मिळाला, कँटीनमध्ये जा, तिकडे चौकशी करा आणि मग पीएम सोबत हे सगळं डिस्कस करा. भारीच.

या अशा कंटाळवाण्या गोष्टींमुळे काहीतरी वेगळं करावसं वाटत होतं. ट्रेकींग वगैरे कधीतरी ठीक वाटायचं. आणि तसंही मला जय भवानी जय शिवाजी म्हणत उन्हातान्हात वणवण करत फीरण्यात काहीही रस नव्हता. हडपसरला ग्लायडींग सेंटर आहे असं ऐकलं होतं.त्याची माहिती काढली होती. पण प्रत्यक्ष जाणं मात्र होत नव्हतं. हे सगळं असं चालू असताना एका मित्राने सहज म्हटलं की ड्रायव्हींग शिक. कल्पना वाईट नव्हती. मला निखिलची आठवण आली. मी आणि निखिल महापेला असताना बेस्ट फ्रेंड होतो. पुढे तो अमेरिकेला गेला. दोन महिन्यांनी मीसुद्धा गेलो. दोघांची ऑफीसेस दोन वेगवेगळ्या शहरात होती. दोन शहरांमधलं अंतर कारने अर्धा तासाचं. तो म्हणे मी तुझ्यासोबत राहायला येतो, आपण दोघात कार घेऊ. म्हणजे मला तुझ्या तिकडून ऑफीसला येता येईल. मला काही प्रॉब्लेमच नव्हता. झालं. निखिल आला तो माझा शोफर बनुनच. मी काही कधी कारच्या व्हीलला हात लावला नाही.

त्यामुळे आता मात्र ड्रायव्हींग शिकायला काही हरकत नव्हती. हो नाही करता करता एक दिवस पैसे भरुन टाकले आणि आमचा ड्रायव्हींगचा क्लास सुरु झाला. बिच्चारा ट्रेनर. अक्षरशः झेलत होता मला. माझ्याईतका मंद त्याला कधीच भेटला नसेल. आपला राग मोठया मुश्किलीने कंट्रोल करुन तो समजावायचा, अहो सर एव्हढा अर्जंट ब्रेक लावलात तर मागचा गाडीवाला येउन आपल्याला धडकणार नाही का. ट्रेनिंगचे पंधरा दिवस संपले. हळूहळू का होईना, ड्रायव्हींग हा प्रकार आवडायला लागला होता. आता गाडी विकत घ्यावी असं वाटू लागलं होतं. नाही म्हणायला युएसला असताना भारतात परत गेलो की एक सेकंड हँड अल्टो घ्यायची असं ठरवलं ही होतं. अधून मधून मारुतीची ट्रु व्हॅल्यू वेबसाईट पाहत होतो. परंतू भारतात आल्यावर मात्र तो विचार बारगळला होता.

आता मात्र राहून राहून नवी कार घ्यावीशी वाटत होती. बाबांजवळ विषय काढला.
"अल्टो नको", बाबांनी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात त्यांचं मत सांगितलं.
"का?"
"खुप छोटी आहे. बसल्यावर असं वाटतं की आपण जमिनीवरुन सरपटत चाललो आहोत."
"तुम्ही हे ज्या कारबद्दल बोलत आहात ती अल्टो नसेल. एट हंड्रेड असेल. अल्टो इतकीही छोटी नाही."
"पण नकोच."

अल्टोचा ऑप्शन बाबांनी निकालात काढला. दुसरा ऑप्शन पुढे आला तो वॅगन आर. वेबसाईटवर जाऊन डीटेल्स काढले. मला आवडली. घरच्यांना फोटो दाखवले.
"ही टुरीस्ट कार वाटते रे."
मी कपाळावर हात मारुन घेतला. एव्हाना मी कार घेतोय ही बातमी माझ्या मित्रमंडळीत पसरली होती. मी वॅगन आरचा विचार करतोय आणि ऑन रोड कॉस्ट फोर प्लस आहे हे सांगताच माझ्या बर्‍याच मित्रांनी "देन व्हाय डोन्ट यू गो फॉर आय टेन?" असा प्रश्न मला केला होता.

रस्त्यावर धावणार्‍या आय टेन पाहील्या आणि मी पाहता़क्षणीच त्या कारच्या प्रेमात पडलो. ऑन रोड पाचच्या आसपास जात होती. हरकत नव्हती. मी गाडी दिवाळीला हवीय म्हणून लगेच बुकिंग करुन टाकलं. ड्रायव्हींगचा क्लास लावणं ते गाडी बुक करणं हा जेमतेम महिन्याभराचा कालावधी होता. महिन्याभरात मी कार बुकसुद्धा केली होती. माझे डोळे भरुन आले. मन भुतकाळात गेलं...

बारावी झाली. ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं. ज्यावर्षी मी ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं त्याच वर्षी ईंजिनीयरींगच्या फ्री सिटची फी चार हजारांवरून दहा हजारावर गेली. बाबांना धक्काच बसला. कारण बाबांनी वर्षाला चार हजार रुपये फी गृहीत धरून माझ्या ईंजिनीयरींगच्या खर्चाचा हिशोब केला होता. माझ्या सुदैवाने एक गोष्ट चांगली होती. ईंजिनीयरींग कॉलेज माझ्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे मी घरुन रोज येऊन जाऊन कॉलेज करू शकणार होतो. माझा बाहेर राह्यचा खायचा खर्च वाचणार होता. झालं. हो नाही करता माझं ईंजिनीयरींग सुरु झालं. पाठच्या भावांमध्ये फक्त एकेक वर्षाचं अंतर असल्यामुळे आता एक बारावीला होता तर छोटा अकरावीला. खर्चाची थोडीफार ओढाताण सुरू झाली होती.कॉलेज थोडंसं आडवाटेला होतं त्यामुळे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या कमी एस टी बसेस कॉलेजला जायच्या. घरी बाबांची एक जुनी सायकल होती. मी सोयीचे पडेल म्हणून सायकलने कॉलेजला ये जा करण्याचा निर्णय घेतला. जायचे आठ किलोमीटर आणि यायचे आठ किलोमीटर. सोळा किलोमीटर तर होतं. आणि तसं त्या सायकल वर मी एक वर्ष काढलं सुदधा.

दुसरं वर्ष सुरु झालं. भावाची बारावी संपली होती. पठठयाने मेडिकलची एंट्रन्स एग्झाम सुदधा क्लियर केली.
"बाबा त्याच्या मेडिकलच्या फीचं काय करणार आहात तुम्ही?"
"बघूया. त्याची या वर्षीची फी भरण्याइतके पैसे आहेत माझ्याकडे जमा. या वर्षीची फी भरुया आपण त्याची. पुढच्या वर्षीपासूनची फी भरण्यासाठी आपण बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज घेउया"
"बाबा, त्याने फीचं भागेल. मेडीकल कॉलेज दापोलीला आहे. त्याला हॉस्टेलला राहावं लागेल. त्याच्या खर्चाचं काय?"
"होईल काहीतरी. तू काळजी करू नकोस." बाबा माझ्या खांदयावर थोपटत मला धीर देत होते.मी मान वर करुन बाबांच्या चेह-याकडे पाहीलं. बाबांचे डोळे अश्रूने डबडबले होते.

माझं सेकंड ईयर चालू होतं. भावाचं मेडीकल कॉलेज चालू झालं होतं. सर्वात छोटा भाऊ आता बारावीला होता. खर्चाचा ताण वाढला होता. गरीबी काय असते हे आता जाणवायला लागलं होतं. अशातच माझी सायकल आता रोज काहीबाही दुखणं काढू लागली होती. जुनीच सायकल ती. त्यात जवळ जवळ दिड वर्ष मी तिला रोज सोळा किलोमिटर दामटलेली. आज काय तर चेन तुटली. उदया काय तर पेडल तुटलं. असं रोज काहीतरी होऊ लागलं. राहून राहून वाटत होतं की नवी सायकल मिळाली तर. पण ते तितकं सोपं नव्हतं. नवी सायकल आणण्यासाठी पैसे कुठून येणार होते. नाही म्हणायला मी सायकलींच्या वेगवेगळ्या दुकांनांमध्ये मी मला हव्या तशा सायकलच्या किंमती काढल्या होत्या. साधारण सतराशे अठराशे पर्यंत चांगली सायकल मिळू शकत होती. पण एव्हढे पैसे आणणार कुठून. खुप विचित्र दिवस होते ते. माझे क्लासमेट ज्या दिवसांमध्ये चाळीस पन्नास हजारांच्या मोटार सायकल घेऊन कॉलेजला यायचे त्या दिवसांमध्ये मला सायकल घेण्यासाठी अठाराशे रुपये कुठून आणायचे किंवा तेव्हढे पैसे बाबांकडे कसे मागायचे हा प्रश्न मला पडला होता.

शेवटी एक दिवस थोडं घाबरत घाबरतच मी बाबांसमोर विषय काढला.
"बाबा, हल्ली सायकल खुप काम काढते"
"चालवून घे ना राजा"
"नाही हो बाबा. मला खुप त्रास होतो. आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिची चेन इतक्या पडते की विचारू नका. जरा टाईट करून घेतली सायकलवाल्याकडून की मग सायकल चालवताना खुप जोर लावावा लागतो. आणि मग दम लागतो मला"
"अरे पण नवी सायकल दोन हजाराच्या आत येणार नाही. तेव्हढी महाग सायकल नाही परवडणार आपल्याला"
"बाबा, बघा ना थोडं"
बाबांचा नाईलाज आहे हे मलाही कळत होतं पण त्या जुन्या सायकलमुळे रोजचं सोळा किलोमीटरचं सायकलिंग करताना मलाही खुप त्रास व्हायचा. शेवटी बाबांनी पाचशे पाचशे रुपये जमेल तसे देईन असं एका ओळखीच्या सायकलवाल्याला सांगितलं आणि मला नवी सायकल मिळाली....

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

"ओ साबजी उठो. अगर सोनाही हैं तो घरपेही सो जाओ ना. यहापे क्या सोफापें एसीमें सोनेको आते हो क्या?"
मी डोळे चोळत उठलो. नाईट शिफ्टच्या सिक्युरीटीला सॉरी म्हटलं. त्याचंही बरोबर होतं. मी सीडॅ़कच्या जुहू, मुंबई सेंटरच्या पार्टटाईम डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतलं होतं. विकडेजला ऑफीस. शनिवारी आणि रविवारी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कोर्सचे थेअरी क्लासेस असायचे. जॉबला असणार्‍यांसाठी विकडेजना रात्री प्रॅक्टीससाठी लॅब्ज ओपन असायच्या. मीही दिवसा ऑफीसला जाऊन संध्याकाळी गोरेगांवला रुमवर न जाता सरळ अंध्रेरीला उतरून जुहूला सीडॅकला जात असे. बरेच वेळा उशीर झाला की नउ साडे नउनंतर बस मिळायची नाही. मग अंधार्‍या जुहू गल्लीतून घाबरत घाबरत तंगडतोड मी कॉलेजला जात असे. दिवस ईतके वाईट होते की माझ्याजवळ इंजिनीयरींगची डीग्री होती, प्रोग्रामर म्हणून नोकरी होती. पण पगार होता साडेतीन हजार. आणि या साडेतीन हजारात मला माझं मुंबईतलं राहणं, खाणं, प्रवास आणि माझी पीजीची फी हे सगळं भागवायचं होतं. परीस्थीती माझा अंत पाहत होती. पण माझ्या डोळ्यात आकाशात भरारी मारायची स्वप्नं होती. मला कुठल्याही परिस्थीतीत माघार घ्यायची नव्हती. त्यामुळे दिवसा ऑफीसला जायचं. संध्याकाळी ऑफीस सुटलं की सरळ जुहू गल्लीतून रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास अर्धा तास चालत सीडॅकला जायचं. रात्रीचं जेवण परवडणारं नव्हतं, त्यामुळे कॉलेजसमोरच्या एका वडापावच्या गाडीवर दोन वडापाव किंवा भजीपाव असं जे काही मिळेल ते खायचं. साडे अकरा बारा पर्यंत सी, सी प्लस प्लस आणि जावाच्या कोडींगची प्रॅक्टीस करायची. आणि मग सिक्युरीटीची नजर चुकवून तिथेच सोफ्यावर पायाचं मुटकुळं करुन झोपायचं. सकाळी सहाला उठायचं, गोरेगांवला रुमवर जायचं, आंघोळ वगैरे उरकून लगेच वेस्टर्न रेल्वेने धक्के खात चर्चगेटला, ऑफीसला...


सहा वर्ष झाली या सार्‍याला. माझ्या लाईफस्टाईलमध्ये ड्रास्टीक ट्रान्स्फॉर्मेशन झाले आहेत. सुखं, समृद्धी, पैसा सारं काही आहे. पण सोबत त्या वडापाव खाऊन काढलेल्या रात्रींच्या आठवणीही सोबत आहेत. आणि का कोण जाणे येणार्‍या सुखांच्या जोडीने त्या आठवणीही येतात. आणि येताना एकटयाच न येता डोळ्यात पाणीही घेऊन येतात...